मुंबई (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींच्या माध्यमातून विधान परिषदेवर निवडून
द्यायच्या रिक्त झालेल्या सात जागांसाठी आज (बुधवारी)
मतमोजणी होणार असून, कोण बाजी मारणार हे चित्र स्पष्ट होणार
आहे.
विधान परिषदेच्या रिक्त आठ जागापैकी
नागपुरात भाजपचे गिरीश व्यास बिनविरोध निवडून आल्याने सात जागांसाठी मतदान झाले. आज सकाळी आठ
वाजता मतमोजणी सुरू होऊन थोड्याच वेळात निकाल हाती येतील. मतदान मोजकेच असल्याने
तासाभरात निकाल येण्याची अपेक्षा आहे.
राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजप
युतीच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा कागदोपत्री सामना असला, तरी घोडेबाजार आणि दगाफटका यामुळे सर्वच उमेदवारांच्या
हृदयाचे ठोके वाढले आहेत. मुंबईतून दोन जागांमधून शिवसेनेचे रामदास कदम यांचा विजय
निश्चित मानला जात आहे. तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर प्रसाद लाड यांनी
आव्हान निर्माण केल्यामुळे कदम यांच्यासह कॉंग्रेसचे मुरब्बी भाई जगताप यांची
चिंता वाढली आहे. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे-नंदुरबार,
अकोला-बुलडाणा येथील उमेदवारांची आहे.
