दिवाळीआधी कालवा सल्लागार समितीची बैठक : पाच धरणांत केवळ 49 टक्केच पाणीसाठा
प्रकल्पातील पाणीसाठ्याची परिस्थिती बिकट : शेतीच्या पाण्याबाबत प्रश्‍नचिन्ह!


पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातंर्गत असणाऱ्या धरणांच्या लाभक्षेत्रात यावर्षी पावसाने अवकृपा केल्याने पाण्याची परिस्थिती भयावह आहे. प्रकल्पातील पाच धरणांमध्ये आज मितीस केवळ 49 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याचीही यंदा परिस्थिती बिकट असल्याने शेतीसह उद्योगांना पाणी मिळणे कठीण आहे. यातून गावागावांत पाण्यावरून संघर्ष होण्याची चिन्हे अधिक आहेत. त्यामुळे दिवाळी आधी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्यावरून संघर्षाचेच फटाके फुटण्याची दाट शक्‍यता आहे.
जिल्ह्यात यंदा पाण्याचा प्रश्‍न अधिक तीव्र झाला आहे. त्यात कुकडी प्रकल्पात असणारा 15 टीएमसी पाणीसाठा येथील जनतेच्या दृष्टीने समाधानकारक नाही. मात्र अशाही परिस्थितीमध्ये कुकडीचे पाणी मराठवाड्याला देण्याचा घाट घातला जात असल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते. शासकीय नियमानुसार सध्या पाणी वाटपाचे सर्वाधिकार जिल्हाधिकारी यांना असून ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे पाण्याचे नियोजन आणि वाटप केले जाणार आहे. त्यात पाटबंधारे विभागाचे अधिकारी हस्तक्षेप करू शकणार नाही.
राज्यातील समृद्ध जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे, परंतु यावर्षी कमी पावसामुळे दुष्काळाच्या झळा मोठ्या स्वरूपात यंदाच्या ऑगस्ट महिन्यापासूनच जाणवू लागल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कुकडी प्रकल्पात 36 टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यात परतीचा पाऊस अत्यंत कमी झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठ्याची वाढ झाली नाही. प्रकल्पातील डिंभे आणि माणिकडोह धरणात अपेक्षेप्रमाणे यंदा पाणीसाठा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पाण्याचे नियोजन करणे यंदा खुपच कठीण जाणार आहे.
कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणात 62 टक्के तर माणिकडोह धरणात 22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असणारी महत्त्वाची असणारी ही दोन धरणे आहेत. त्यामुळे या धरणांच्या पाणीसाठ्यातच वाढ न झाल्याने यंदा कुकडी प्रकल्पातील उपलब्ध असणाऱ्या पाण्यावरून वाद चिघळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
'नगर-सोलापूरला पाणी जाऊ देणार नाही' :
मुळातच यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न हा अधांतरीतच राहणार आहे. नगर आणि सोलापूरला पाणी जाऊ देणार नाही अशी भूमिका जुन्नर, आंबेगावच्या लोकप्रतिनिधींनी घेतली आहे, त्यामुळे कुकडीचे पाणी नगर आणि सोलापूरला गेले नाहीतर सध्या प्रकल्पात उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा जुन्नर, आंबेगावकरांना पिण्याबरोबरच शेतीच्या पाण्यासाठी काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो; परंतु शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे कुकडीचे पाणी जर नगर, सोलापूरला गेले तर पाणीप्रश्‍न अधिक गहन होवू शकतो.
पाणी पिण्यासाठी राखीव :
कुकडी प्रकल्पातील पाणी यंदा पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतीच्या पाण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. कुकडी खोऱ्यामध्ये गेल्यावर्षी सुमारे 29 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. यंदा तोच पाणीसाठा केवळ 15 टीएमसी आहे. म्हणजेच पाण्याची टक्केवारी कितीतरी पटीने घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ 13 ते 14 टीएमसी पाणीसाठा यंदा प्रकल्पात कमी आहे.
धरण पाणीसाठा टक्केवारीत :
माणिकडोह - 19.24
पिंपळगाव जोगे - 36.27
येडगाव - 100
वडज - 98.73
डिंभे - 62.02
 
Top