वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये
यासाठी या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली होती. याच पद्धतीने आता २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीची फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
यामुळे बारावीच्या नियमित परीक्षेत नापास
झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी
तातडीने मिळणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचू शकेल आणि या फेरपरीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना वर्ष न
गमावता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट
होता येईल, हा यामागील उद्देश असल्याचे
तावडे यांनी सांगितले.
गेल्या
वर्षी दहावी परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत आयोजित करून त्याचा निकाल २५
ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या
फेरपरीक्षेमध्ये ५७,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण
झाले आणि ते नव्याने इयत्ता ११ वी च्या प्रवेशासाठी पात्र ठरले त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळले होते.
दहावी
आणि बारावीच्या नियमित परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येतात आणि पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येतात.
परंतु, गेल्यावर्षी विनोद तावडे यांनी दहावीच्या फेरपरीक्षा जुलैमध्ये
घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम प्रतिसाद
मिळाला. विशेष म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले नाही आणि ते निकालानंतर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
सामील झाले. त्यामुळे आता उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (बारावी) फेरपरीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरऐवजी
जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
(दहावी) फेरपरीक्षाही याच सुमारास होतील, असे विनोद तावडे यांनी
स्पष्ट केले.
