जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीखंडेरायाच्या दर्शनासाठी विविध
भागातून भाविक येत असतात, त्यामुळे जेजुरगडावर दिवसातले आठरा तास तरी
वर्दळ असते. या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक राजा असो व रंक असो हा याचक
असतो त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्तीसाठी श्रीखंडेरायाला साकडं घालण्याची
परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. याच येणा-या भाविकांच्या दान धर्मावर आपली
गुजराण करण्यासाठी अनेक भिक्षेकरी पायरी मार्गावर भिक्षा मागत असतात. एखादा
दाता आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे दान करीत असतो. यातील अनेक भिक्षेकरी उन
वारा थंडी पावसात आडोसा धरून भिक्षा मागत असतात. परिस्थितीने रंजलेल्या
गांजलेल्या माणसांची सर्वसाधारणपणे आपणास किळस वाटत असते, ते कसे राहतात ?
काय खातात याची विचारपूस करण्याची तसदीही आपण घेत नाही. गेल्या पंधरा वीस
दिवसामध्ये थंडीचा कडाका वाढल्याने पुरेसे अंथरायला आणि पांघरायला
नसल्यामुळे खूप हाल होत आहेत हे पाहून जेजुरीतील मेघमल्हार प्रतिष्ठाण व
मुंबई स्थित डॉ.माया आणि दीपक सातवळेकर दांपत्याने गरजवंत भिक्षेकरी
मंडळींसाठी ब्लँकेट वाटपाचा निर्णय घेतला.





