मुंबई (पुणे सुपरफास्ट न्युज)-
विदर्भाचा विकास करायचा असेल, तर स्वतंत्र राज्याखेरीज पर्याय नाही. सरकारचा निधी सर्व विभागांमध्ये समन्यायी पद्धतीने द्यावा लागतो, स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच स्वतंत्र विदर्भाची मागणी महाधिवक्ता पदावरील व्यक्तीने केल्याने खळबळ उडाली असून, शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्याच्या महाधिवक्त्यांची नेमकी भूमिका काय, याचे स्पष्टीकरण घ्यावे, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आतापर्यंत अनेकदा स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे सत्तेवर असताना ते कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला कायम विरोध असून, अणे यांची भूमिका आमच्यासमोर जाणून घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे रावते यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस हे अखंड महाराष्ट्राचे असून महाधिवक्त्यांनीही ते भान ठेवले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.


 
Top